Thursday, December 15, 2011

सूर असे झंकारले,
ताल ऐसे ठेकले..
हृदयाचे हृदयाला गुज,
न सांगता उमगले.. 


मागे वळून पाहतांना,
खूप काही दिसत जात..
साठवून फक्त हृदयात,
गप्प बसावं लागत..


तुझ्या शिवाय माझ्या हृदयाचा, 
एक कोपरा रीताच राहील..
तुझ्या शिवाय माझं जीवन,
शुष्क वैरण वाळवंट होईल..


आपल्या जवळ नाही जे, 
त्यासाठी कशाला झुरायचं..
आहे त्यात समाधान मानून, 
पुढे पुढेच चालायचं..    

Friday, November 25, 2011


जेव्हा नाती बद्भ होतात,
तेव्हा कशाचीच तमा नसते..
हमरस्ता अन पाऊलवाटाच काय,
महासागर ओलांडण्याची जिद्द असते..


Monday, November 14, 2011

कशाला हवी ती धडपड
कशाला हवा तो प्रवास
रोखून धरावा आता श्वास
संपवावा एकदाचा वनवास..



कोणतीही नशा
ही शेवटी नशाच
ओसरली की उमगते
झालेली स्वत:ची दुर्दशा..


कितीही केला आयुष्यभर प्रयास
तरी एक अधिक एक होतच नाही
एकातून एक वजा होऊन श्युन्य कधी उरतो
हे आपलचं आपल्याला कळत नाही..


मृत्यूलाही असं कवटाळावं 
राखेचाही भार न राहावा 
निमुटपणे निघून जावं 
कोणताही करार न उरावा.. 


एखाद्याचं आपल्या मनातलं स्थान
इतकं कसं स्थितप्रज्ञ असतं,
स्वप्नं भंगुन गेली तरीही
ते मात्र अभंगच असतं..











Wednesday, November 2, 2011



मी ही ठरवलंय आता,
दाटलेला मेघ व्हायचं..
कितीही आला थंडगार वारा,
तरीही मुळीच नाही बरसायचं..  

Friday, October 21, 2011

आता मीही  ठरवलयं,
दाटलेला मेघ व्हायचं..
कितीही आला थंडगार वारा,
तरही 

Sunday, September 18, 2011

आठ्वणींच एक विचित्रच
कोडं असतं..
सुखद असल्यातर..
ते क्षण विरले म्हणून
मन अस्वस्थ होतं..
अन दु:खद असल्यातर..
त्या जाणिवेनेच हृदय
पिळवटून निघतं..  


तुला नाही कळायचं 
माझ्या मनातलं गुपित
मी ते दडवलय 
माझ्या हृदयाच्या कुपीत.. 


मनातले इमले मनात
अश्यारितीने रचले जातात
कोसळू लागतात जेव्हा ते
'स्व'लाच जमीनदोस्त करतात..


आपल्या पदरात जे पडलय
ते झेलावच लागतं
भाग्यात जे लिहिलय
ते पेलावच लागतं..
   



Saturday, September 3, 2011

वेदना 
जखमा करणाऱ्या हातांपेक्षा
मलमपट्टी करणारे हात 
वेगवान असले की
जखमांच्या वेदना
जाणवत नाही..
पण 
मलमपट्टी करणाऱ्या
हातांनीच जखमा केल्यातर  
 त्या वेदनांना 
अंतच राहत नाही..

Sunday, August 28, 2011


पोळा
घुंगराचा आवाज,
झुलीचा तो साज..
रंगविले शिंग,
घेवूनी रंग..
डोलवीतो मान,
बळीराजा तो छान..
देवू नैवेद्य पुरणपोळी,
कृतज्ञता आपली भोळी..
जाणीव ठेवूनी अंतरी,
राबत असे शेतावरी.. 

Tuesday, July 5, 2011


जीवाच्या आकांताने,बेभान होऊन
शब्दाला शब्द जुळवीत जावं..
क्षणात शाईची दौत उपडी होऊन
सार काही भिजून,मिटून जावं..   

ओंजळ ओतप्रोत भरलेली
रिती कधीच नाही व्हायची..
प्रेमाच्या ह्या सागराला 
ओहोटी कधीच नाही लागायची...! 

Monday, June 20, 2011

मला कितीही सांगितले शांत बस
मी थोडीच ऐकणार आहे,
शेवटी तुला जे करायचं ते तू कर 
मला जे करायचं तेचं मी करणार आहे..


माझ्या कवितेची प्रत्येक ओळ 
तुला आर्ततेने साद घालते, 
तू शब्दांनाच घाबरतोस 
मग ती कोषात मिटून जाते.. 


मी अन तू ह्यांचं
अद्वैत होता मैत्री जुळते,
मी अन तू स्वतंत्र होता 
मैत्री कुठे असते..? 


ज्या क्षणी सावध रहायचं
त्या क्षणी बेसावध राहिले मी
त्याच क्षणी झाली माझी  परीक्षा
अन पुरती नापास झाले मी..

Tuesday, May 24, 2011


प्रत्येकास हवी असते
एक सावली
विसावा घ्यायला,
एकांताच्या कातरवेळी
मनी मारवा गायला..




कुठून येतो हा आठ्वणींचा  मोहोर
फुलतो कसा हा मनातील गुलमोहोर 
यावी वाटे आता एकतरी  पावसाची सर
सहन होत नाही हा ग्रीष्माचा कहर..

Monday, May 23, 2011

जीवनाच कोडं म्हणतात
असं एक कोडं असतं
त्याच्या प्रश्नाचं उत्तर
प्रश्नातच सापडत असतं..


आठवणींची गरजच नसते 
जेव्हा आठवणच आठव असते
कशाला बहाणा करावा उगीचच
विस्मृतीत काही जातच नसते..


सवय झाली मला आता 
मुकं मुकं राहण्याची
बोलायचं असतं मनातलं जेव्हा 
वेगळचं बोलून जाण्याची..


माझी प्रेम भावना 
मी अशीच अबोल ठेवीन 
तुला कळली तर ठीक 
नाहीतर चोरकप्प्यात दडवून ठेवीन..    
 


कल्पनेच्या चांदण्यात मी
तशीच धूसर उभी राहीन
तू नाहीच आलास तर 
धुक्यासारखी विरून जाईन.. 


तुला हवी असते मी 
तुझी सावली म्हणून ,
कडक ऊन पडताच
निमूटपणे सोबत येणारी 
एक बाहुली म्हणून..  

Tuesday, May 17, 2011

दुनियेच्या पसार्यात तुला,
 माझी आठवण येणार नाही..
एकांतात असतांना मात्र,
माझ्याशिवाय पसाराच होणार नाही..


प्रेम उमगण्यासाठी स्वत:ला,
मृत्युच्या मुशीत लोटाव लागत..
कण कण झिजून स्वत:,
दुसर्यासाठी जगावं लागत..


बेधुंदीचे ते क्षण,
धुंद होवून गेले..
मनाच्या चोर कप्प्यात,
ठेव ठेवून गेले..


तुला काय हवय हे,
तुलाही कळत नाही.. 
मला कळलं तरीही,
मी ते तुला कळवत नाही..    
     

Tuesday, May 3, 2011

मी माझ्या अंगणात
 झाड लावले आनंदाचे
त्याची फुले,
 तुझ्या दारात पडणार  आहे..

सुगंध भरभरून हुंगून घे
त्या फुलांचा
कारण त्यात प्रेमाचाच,
श्वास असणार आहे..

तुझ्या मनाचे फुलपाखरू,
चटकन एका फुलावरून
दुसर्या फुलावर उडून गेले..
तेव्हाच माझे फुलासारखे मन,
पाकळ्या झडून झडून
निर्माल्य झाले..

Thursday, April 28, 2011

प्रेमात असं, 
वाहवत नाही जायचं..
त्यातही योग्य ते शोधण्याचं,
 कसब ठेवायचं..


स्वप्नातलं गाव खुपचं,
मोठ असतं..
वास्तवातल्या गावाला,
कुणाचचं नाव नसतं..


तुला वाटतं,
तुझ्यासाठी झुरते मी..
अरे वेड्या,खर तर 
तुझ्यासाठीचं जगते मी..


कधी कधी खूप गंमत असते,
आपल्याला नक्की काय हवे,
हेच आपल्याला कळत नसते..                 

Thursday, April 21, 2011

शिंपल्या एवढ्या काळजाची तशीच हुरहूर..
जिव्हाळ्याच्या मैत्रीचा असे हा निराळाच नूर..
नको ना येवू देवू  असा  उगा गंभिरतेचा पूर..
अजून प्रवास करायचा  आहे खूप दूर दूर..  
आपल्या मैत्रीत नक्कीच आहे काही खास,  
जसा गणपती जवळ दुर्वांचा अधिवास..
तुझ्या स्नेहाची नित्य असते मला आस,
जसा गणपतीला मोदकांचा हव्यास..
अशी असते तुझ्या आठवणींची सोबत,
जसा गणपती सोबत असतो मूषक..  
तुझ्या लेखी माझी किंमत
शून्य असतानाही,
मी तुझ्यासाठी 
एक लिहिण्याचा अट्टहास केला..
तू मात्र एकातून एक वजा करून,
 माझी पदरी शून्यच दिला.. 


आपल्याला स्वत:पेक्षाही एखाद्यावर 
नको इतका विश्वास असतो,
म्हणूनच झोपेतून त्या जागे होताना 
स्वत:चाच दु:श्वास वाटतो..


Tuesday, April 19, 2011

तू म्हणजे माझ्यासाठी,
हक्काचा निवारा..
जीवनाच्या अंतापर्यनतचा,
एकमेव सहारा.. 
तू बोलत नाहीस जेव्हा,
तुझ्या मनात अबोली फुलते..
नि:शब्दपणे मग ती,
माझ्या ओंजळीत येऊन पहुडते.. 


मी एकटीच तुझ्याशी,
खूप खूप बोलत असते..
तुझ्या प्रतिसादाविना,
स्वत:लाच तोलत असते..


कधी कधी वाटतं,
जीवन हेच एक स्वप्न आहे..
कसं ठरवावं मग, 
काय सत्य अन  काय असत्य आहे..


तुझ्या माझ्यातलं अंतर,
म्हणजे दुरावा नाही..
तुलाही उमगतय हे,
म्हणूनच त्याला पुरावा नाही..


एकांताच्या क्षणीही आता,
स्वत:ला सावरायचं..
इतक्या  दिवस जपलं तुला,
आता स्वत:लाच लपवायचं..


मनातल्या मनात मी उगा,
खंत करत असते..
तू येणार नाही कळत असूनही,
तुझी वाट पहात बसते..
         

Saturday, April 16, 2011

ओंजळ काठोकाठ  भरलेली असतांना,
नको येवूस माझ्याकडे..
माझ्या थेंबांना,   
 त्यात जागाच राहणार नाही..
ओंजळ रिती झाली कि,
धावत ये माझ्याकडे..
  मी ती मुळीच रिती ठेवणार नाही..   
तुला हवा असतो,
आनंदाचा सागर.. 
दु:खाची नको असते, 
एकही सर..
नौका डगमगू लागता तुझी,
सावरायला हवे असतात
 माझेच कर..

सर्वच जण मारतात,
मूकपणाने आरोळी..
त्याचीच मग होते,
माझी चारोळी..



शब्द तेच वाक्य तेच,
संदर्भ का बदलायचे..
कल्पनेतल्या विश्वाला,
थोडेसे वास्तवात येवू द्यायचे..  



मनातलं कुणालाच 
सांगता येत नाही..
म्हणून तर कुणाशीच,
भांडता येत नाही..


संवेदना जाणवण्याची,
मला चांगलीच शिक्षा आहे..
प्रत्येक क्षणात द्यावी लागते,
मला एक परीक्षा आहे..  

  

Tuesday, April 12, 2011

                                                       भावनेच्या उन्हाळ्याला,
भावनेचंच   शहाळ लागतं...
                                                 तसाच थंडावा नाही मिळाला तर,
                                                  अवघं जीवनच करपून जातं..

प्राजक्ताची माझी ओंजळ
अशीच भरलेली राहू द्या..
दरवळणे हाच गुण तिचा
हेच स्मृतीत ठसू द्या.. 

Monday, April 11, 2011

http://roraj.blogspot.com

      अनेक फुलांचा ताटवा आपल्या समोर  थाटला जावा अन आपल्याला कळूच नये त्यातले कोणते घ्यावे..गुलाब तर खुणावतोच..जाईजुईचा नाजूकपणाही मोहवून टाकतो..त्याच वेळेला  मोगराही
त्याच्या सुवासाने साद घालतो..क्षण काळाचंच  अस्तित्व घेवून आलेला "पारिजातक.."अंतिम श्वासापर्यंत दरवळण्याच,त्यागाचे  मोठेपण सांगून जातो..
     अगदी असचं आपल्या मनातील भावनांचं होत..त्यातील काही भावना  आनंद देणाऱ्या  असतात तर काही खूप कष्टी करणाऱ्या..काही हव्याहव्याश्या तर काही जिवच गुदमरून टाकणाऱ्या..काही मोरपिशी पंख   लावण्यास सुचविणार्या तर काही खोल डोहात नेणाऱ्या..पण ह्यातील एकही भावना आपण नाकारू शकतं नाही.. हे सर्व भावविश्वचं तर नकळतपणे जीवनाला अर्थपूर्णता देतं असतं...
    भावना टिकतात पारिजातका सारख्या क्षण काळ..अन देवून जातात शब्दरूपी चारोळ्यांचा नजराणा..